मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेचा वृत्तान्त
महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका 21 ऑक्टोबरला जाहीर झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन गोष्टीं भोवती अनेक बातम्या तसेच अफवा येताना दिसतात. अशा प्रकारच्या अफवा आणि बातम्याना अनेक माध्यमे देखील महत्त्व देताना दिसतात. त्यामध्ये काल शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचा बातमीमुळे काल मोठा धक्का दिलेला आहे. जेव्हा ही बातमी हाती आली तेव्हा एकदा महाराष्ट्राच्या भावी उपमुख्यमंत्रीपद बाबतच्या चर्चांना नव्याने वाचा फुटली होती.
महाराष्ट्राचे बीजेपी अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की महाराष्ट्राच्या भावी उपमुख्यमंत्री पदाविषयी अजून कोणताच निश्चित निर्णय घेतला गेलेला नाही आहे. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मुंबई येथे सहभाग घेतला होता. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली की पुणे-कोथरूड मतदारसंघातून ते निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरत आहेत आणि हा निर्णय बीजेपीच्या वरिष्ठ वर्तुळातून घेतला गेलेला आहे. ते पुढे म्हणाले की बीजेपी-शिवसेना युती झालेली असून जागांच्या वाटपाविषयी चर्चा सुरू आहेत व लवकरच या संदर्भात निश्चित बातमी हाती येईल.
जेव्हा श्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड-पुणे विभागातून बीजेपीच्या निवडणूक निर्णयासंदर्भात नकारात्मक प्रतिसादाविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले की कोणताही पक्ष हा एका व्यक्तीचा बनलेला नसतो तसेच राजकारणामध्ये अनेक जबाबदाऱ्या अनेकांवर सोपवल्या जातात जे या जबाबदाऱ्यांमध्ये अधिक यशस्वी होतात त्यांना अधिक संधी भविष्यामध्ये प्राप्त होते. पक्षाच्या निर्णयानुसार त्यांना कोथरूड येथील आमदार म्हणून काम करण्याची संधी आता निवडणुकांनंतर प्राप्त होणार आहे आणि ते त्याला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील.
या पत्रकार परिषदेदरम्यान कोथरूडच्या विद्यमान आमदार सौ मेधा कुलकर्णी यांना पक्षाच्या निर्णयामुळे झालेल्या निराशेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की बीजेपीचे महाराष्ट्राचे प्रमुख माझ्या मतदारसंघामधून लढत आहेत ही मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल. तसेच या निवडणुकांमध्ये दादा जास्तीत जास्त मतांनी विजयी होतील याची काळजी आम्ही निश्चितच घेऊ.
या पत्रकार परिषदेदरम्यान श्री चंद्रकांत पाटील यांनी भावी उपमुख्यमंत्रीपद बाबत कोणतीही निश्चित माहिती दिलेली नाही. याअगोदर शिवसेनेने श्री आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यानंतर उपमुख्यमंत्री असे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उत्तरामुळे उपमुख्यमंत्रीपदाची जागा राज्यात असणार आहे की नाही याविषयी निश्चित बातमी मिळालेली नाही. तसेच श्री चंद्रकांत दादा पाटील यांची पुणे-कोथरूड विभागासाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि अशी अपेक्षा आहे की विद्यमान आमदार सौ मेधा कुलकर्णी त्यांना या निवडणुकांसाठी पूर्णपणे सहकार्य करतील. बीजेपीच्या नेत्यांचा या प्रकारचा दृष्टिकोन हा अत्यंत स्तुत्य असून पक्षाच्या कामासाठी झोकुन देण्याची त्यांची वृत्ती तसेच वैयक्तिक पदांची आसक्ती न बाळगणे या गोष्टी त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. श्री चंद्रकांत दादा पाटील आणि सौ मेधा कुलकर्णी या दोघांनीही पक्षाने केलेले बदल खिलाडूवृत्तीने स्वीकारलेले आहेत आणि ते त्यांच्या समाजकार्याची सुरुवात एका नव्या भूमिकेच्या माध्यमातून आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून करण्यास सज्ज झालेले आहेत. अशाप्रकारचा दृष्टिकोन तसेच बीजेपीच्या तत्त्वांशी असणारी निष्ठा आणि सामाजिक जाणीवा यामुळे बीजेपीचे नेते इतरांपेक्षा वेगळी ठरतात आणि हीच बीजेपीची सर्वात मोठी ताकद आहे असे म्हणावे लागेल.
Comments
Post a Comment