गणेश उत्सव शांततेत आणि साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर पोलीस यांच्या पुरस्कार समारंभाला केशवराव भोसले ऑडिटोरियम कोल्हापूर येथे उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्वांना विनंती केली की एकत्रितरित्या काम करून कोल्हापूरचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याची वेळ आलेली आहे जेणेकरून पूरग्रस्त कुटुंबीयांना आधार मिळेल. या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव, जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई, आणि पोलिस विभागाचे डॉक्टर अभिनव देशमुख उपस्थित होते.
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी जनतेशी संवाद साधला आणि महत्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूर आणि परिसराचे या मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिस्थिती सावरण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते ,आणि विविध क्लब यांनी मोठ्या प्रमाणात पूरग्रस्तांना मदत आणि सुटका या कामांमध्ये योगदान दिले. या सर्वांचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष आभार मानले आणि त्यांच्या कोल्हापुरातील स्थितीला पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांचे ही कौतुक केले. तसेच श्री पाटील पुढे म्हणाले की कोल्हापूरचे जुने वैभव कोल्हापूरला प्राप्त करून देण्याची वेळ आता आलेली आहे. सरकार या कामासाठी कटिबद्ध आहेच परंतु त्याचबरोबर विविध गणेशोत्सव मंडळांनीही या प्रक्रियेमध्ये जरूर सहभागी व्हावे.
आपल्या भाषणादरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जनतेला गणेशोत्सव साधेपणाने आणि शांततेमध्ये साजरा करावा असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की आता पूरग्रस्त कुटुंबीयांसाठी मदत करण्याची वेळ आलेली आहे, जर विविध गणेशोत्सव मंडळांनी या माध्यमातून निधी जमा केला तर त्याचा फायदा पुनर्वसनासाठी निश्चितच होऊ शकतो.त्याचप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले की गणराया पुरस्काराचे वितरण गणेशोत्सवानंतर लवकरच होईल आणि त्याच्या बक्षीस रकमेमध्येही वाढ करण्यात येईल.
महाराष्ट्राचे बीजेपी अध्यक्ष श्री चंद्रकांत
पाटील यांनी यावेळी पूरग्रस्त कुटुंबांना त्यांच्या भाषणातून मजबूत आधार देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की सरकार पूरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत पुरवीत आहे, तसेच राज्य सरकारने कृषी कामगारांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी खेड्यांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांना सुरुवात होत आहे.
या कार्यक्रमादरम्यान खासदार माननीय संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर मधील पूरपरिस्थिती मध्ये मदत करणाऱ्या सर्व घटकांची स्तुती करून पुढे असे प्रतिपादन केले की एक विशिष्ट मास्टर प्लॅन अशा परिस्थितीसाठी बनवला गेला पाहिजे ज्यामुळे लवकरात लवकर मदत होऊ शकेल आणि पुनर्वसनाची कामे होऊ शकतील.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना यावेळी पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला व या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीमध्ये प्रशासन, आर्मी, पोलिस, रेल्वे, स्वयंसेवी संस्था, एनडीआरएफ ,आणि अनेक सामाजिक घटकांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. माननीय पालकमंत्री श्री चंद्रकांत
दादा पाटील यांनी या दरम्यान एक नेता म्हणून आवश्यक ती भूमिका पार पाडली आणि पूरग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याचप्रमाणे श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकांना आणि विविध मंडळांना यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना साधेपणाने आणि शांततेत पार पाडावा अशी विनंती केली आहे. या निर्णयामुळे मुख्यतः सणावरील खर्चाचा बोजा कमी होऊन हे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरले जाऊ शकतील. आशा आहे की कोल्हापूर आणि परिसरातील जनसमुदायाला या निर्णयाचे महत्त्व समजेल आणि त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव तेथे शांततेत आणि साधेपणाने साजरा केला जाईल
Comments
Post a Comment